
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत.
मंगेश पाडगावकरांच्या या कवितेची दुसरी ओळ म्हणजे ” सगळ्यांचे अगदी सेम असत” ही आहे.
पण खरच का सगळ्यांचे सेम असत. तर मला तरी तस वाटत नाही. याबाबतच माझ जे निरीक्षण आहे. ते मी तुमच्यापुढे ठेवतो. त्यानंतर तुमच मत तुम्ही ठरवा.
प्रियकर – प्रेयसी किंवा नवरा – बायको किंवा कोणत्याही जवळच्या नात्याचे अनेक प्रकार असतात किंवा स्तर असतात.
काही नाती ‘टीटी एमएम” वाली असतात. म्हणजे माझं मी आणि तुझ तू.
हॉटेलमध्ये गेल्यावर तु जे खाल्लस त्याच बील तु भरायचं. आणि मी जे खाल्ल त्याचे बील मी भरायचे. अगदी काटेकोर हिशोब. जेवढ्या रकमेचे प्रेझेंट तु मला दिलस, बरोबर तेवढ्यात रकमेचे प्रेंझेंट मी तुला देणार. तुझ्या माणसांची जबाबदारी तुझी, त्यांची सरबराई आणि त्यासाठी खर्च तु करायचा आणि माझ्या माणसांचा मी! असे असंख्य काटेकोर हिशोब या नात्यात असतात.
काही नाती ही पार्टनरशीपची असतात. यामध्ये दोघांच नात ही फर्म असते. आणि हे दोघे त्याचे पार्टनर असतात. त्यामुळे 50 – 50 टक्क्यांचा हिशोब असतो. जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या असतात. हिथे हॉटेलमध्ये गेल्यावर 50 -50 टक्क्यांनी हिशोब होतो. घराच्या खर्चात इथे निम्मे निम्मे वाटे केले जातात. सरकारमध्ये जशी खात्यांची वाटणी होते तशी हिथेही होते. बहुतेक वेळा परराष्ट्र व्यवहार, संरक्षण, फायनान्स यासारखी खाती एकाकडे आणी गृह, महिला व बालकल्याण यासारखी खाती दुसऱ्या पार्टीकडे दिली जातात.
मात्र हिथेही हिशोब काटेकोर. या नात्यात नफा होण्याचा उद्देश असतो आणि तो ही निम्मा निम्मा वाटला जाईल याकडेही बारीक लक्ष असत.
काही नाती अशी असतात तिथे हिशोबाकडे दुर्लक्ष असत. अस नात म्हणजे गुरु आणि शिष्याचे नाते. इथे एकजण गुरू असतो आणि दुसरा शिष्य. इथे गुरू म्हणेल त्याचे श्रध्दापुर्वक पालन होत. इथला गुरु नेहमीच शिष्याच्या नजरेतून बरोबर असतो. बहुतेकवेळा गुरूची भुमिका पुरुषवर्गाकडे असते. परंतू काही वेळेस स्त्रियाही ही भुमिका अगदी उत्तम निभावतात.
याखेरीज काही ठिकाणी हुकुमशाही असते. तिथे एक हुकुमशहा असतो आणि दुसरा गुलाम. काही नात्यात लोकशाही असते. तिथे प्रत्येकाचा मत मांडण्याचा अधिकार असतो. अर्थातच त्यामुळे अनेकदा निर्णय वेळेवर होत नाही. आणि अनेकदा निर्णय होतो त्यावेळी वेळ निघून गेलेली असते.
पण खरी गंमत त्यावेळी होते त्यावेळी या नात्यातील दोघांजणांना आपण नाते नेमके कोणत्या प्रकारातल आहे ते समजत नाही. म्हणजे होत अस. एकजण ‘ ‘टीटीएमएम’ वाला असतो. त्यावेळी दुसरा ‘ गुरु – शिष्य’ प्रकाराने वागायला जातो.
एकजण दुसऱ्याला गुरू बनवायच्या मागे असतो, त्यावेळी दुसरा पार्टनरशीप प्रकाराने हे नाते चालवायला बघतो.
आणि एवढच नाही. काही वेळेस काल हुकुमशाही प्रकाराने चाललेल्या घरात आज लोकशाही प्रकार सुरू होतो. दुसऱ्याकडून हव ते काढून घेईपर्यंत वेगळी भुमिका आणि त्यानंतर लगेच दुसरी भुमिका असही सतत घडत राहत. घरातल्या खात्यांच वाटपही अचानक बदलत. आणि हा बदल झालेला दुसऱ्याला माहितीच नसतो. आणि मग जो होतो तो म्हणजे ‘ अरे संसार संसार’ .
पण यापुढचा खरा प्रश्न आहे या सगळ्या नात्यात प्रेम असत का?
उत्तर मोठ कठीण आहे. प्रेम म्हणजे काय याची डेफिनेशन अजूनही कोणाला करता आलेली नाही. पण या सगळ्या नात्यात जर एकमेकांबद्दल विश्वास असेल तर ही नाती टिकतात. तो नसेल तर तुटतात. पण मला अशी अनेक घर माहिती आहेत. तिथे या नवरा बायकोच्या नात्यात हा विश्वासही नव्हता. तरी ते एकत्र राहिले, त्यांना मुलबाळ झाली. अजिबात आवडत नसलेल्या जोडीदारासोबत त्यांनी सगळ आयुष्य काढल. आदळआपट करत आणि भांडत सगळा संसार झाला. केवळ दुसरा उपाय नव्हता, गरज होती किंवा वेगळ होण्याइतक धाडस नव्हत या आधारावर ही नाती टिकली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही ठिकाणी तर या असल्या नात्यातूनही विश्वास आणि प्रेम निर्माण झालेला लोकांनी पाहिला.
पण मला वाटत प्रेमाचा परिपूर्ण भाव दाखवणार नात म्हणजे देव आणि भक्ताचा नाते. अर्थातच ही भक्ती आंधळी भक्ती नव्हे. देवाच्या धाव्यात भक्त इतका मग्न होतो कि अखेर देव कोणता आणि भक्त कोणता हे कळतच नाही. दोघेही एकरुप होऊन जातात. जशी मीरा श्रीकृष्णाशी एकरूप झाली. क्वचित का होईना पण अस नातदेखील आजही कुठेतरी बघायला मिळत.
आणखी एक नात अस आहे, जे वरच्या कुठल्याच चौकटीत मावत नाही. जस रोमियो – जुलियटच, लैला आणि मजनूच, सोनी – महिवालच. शिरीन आणि फरियादच्या प्रेमकहाणीत तर शिरीनला कधीच कळल नाही की फरियादच आपल्यावर प्रेम होत. शिरीन मेली अस खोटच फरियादला कळविण्यात आल आणि तेवढ ऐकूनच फरियादन प्राण सोडला. ही नाती कोणत्याच चौकटीत मावत नाहीत.
माणसाला सगळ्यात प्यारा त्याचा स्वत:चा जीव असतो. पण इथ तो जीवच हे प्रेमिक दुसऱ्यासाठी पणाला लावतात. सोनी महिवालच्या कथेच विवाहित असलेली सोनी दररोज नदीपलिकडच्या महिवालला रात्रीची भेटायला जाते. पोहता येत नाही म्हणून एक माठ बरोबर घेते व त्या माठाच्या आधाराने नदी ओलांडत असते. एके दिवशी तिची नणंद हा पक्का माठ काढून त्या ठिकाणी कच्चा घडा म्हणजे न भाजलेला घडा ठेवते. हा घडा निम्म्यावर गेल्यावर विरघळू लागतो. ते पाहून पलिकडच्या किनाऱ्यावरचा महिवाल तिला वाचविण्यासाठी नदीत उडी घेतो. आणि अर्थातच दोघेही बुडुन मरतात. या सोनीनी त्या कच्चा घड्याला उद्देशून केलेल्या आळवणीची असंख्य गाणी पंजाबमध्ये आजही गायली जातात.
अशा या नात्यांच्या नाना तऱ्हा. म्हणूनच पुन्हा एकदा सांगतो.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत….. पण
सगळ्यांचंच काही सेम नसत.
आता तुमच तुम्ही ठरवा.
( काय ठरवा?
आपल प्रेम कोठल्या प्रकारातल आहे का प्रेम करायच कि नाही ते ?
काहीही ठरवा, पण ठरवा)
घनश्याम केळकर, बारामती
chan
LikeLiked by 1 person